समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 महिला मजुरांचा मृत्यू, 4 जखमी
नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली.
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. कडवंची शिवारात घडलेल्या या भीषण अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि हाहाकार माजला होता.
मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (वय 45, निधोना), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय 35, केळीगव्हाण), मीना परमेश्वर आदमाने (वय 45, निधोना), कांचनबाई प्रकाश आदमाने (वय 50, निधोना), ताराबाई गहेणाजी चौधरी (वय 60, केळीगव्हाण), कडूबाई रामदास मदन (वय 55, केळीगव्हाण) आणि सुमनबाई कचरू आदमाने (वय 70, निधोना) यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले असून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणार्या मजुरांसाठी पुरेशा सुरक्षाव्यवस्था आणि खबरदारी घेतली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच प्रशासनाकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


