महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना : महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असले, तरी त्या संघटित झाल्यानंतर समाजपरिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडविला असून, हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिला एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे, आणि त्यातून  परिवर्तनाची नवी क्रांती घडते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे, शाहीर आप्पासाहेब उगले, संगीता ढेरे, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा महोत्सवाच्या आयोजिका सौ. करुणाताई अच्युत मोरे, राष्ट्रमाता करिअर अकॅडमी च्या संचालिका सौ. चंदाताई अनिलकुमार धारे तसेच अच्युत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Indian_Fast

महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी दिवसभर विविध उपक्रम
हिरकणी महोत्सवात महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, अर्जांचे मोफत वितरण व मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण विषयक जनजागृती, एकल महिलांसाठीच्या योजनांची माहिती, महिला, बालक व मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष कार्यशाळा व जादूच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनाची जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर, महिला कर्मचार्‍यांसाठी पॉश (झजडक) कायद्याविषयी कार्यशाळा तसेच महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कर्तृत्ववान महिलांचा हिरकणी पुरस्काराने गौरव
समाजकारण, कायदा, लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या विविध जिल्ह्यांतील कर्तृत्ववान महिलांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये सामाजिक क्षेत्रातील मुंबईच्या विदुला जगताप, अल्पवयात जादूच्या प्रयोगांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारी जालना येथील कु. प्रज्ञा रंगनाथ खरात, पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी कार्यरत असलेल्या अ‍ॅड. सोनाली कांबळे, छत्रपती संभाजीनगर येथील लोककला क्षेत्रातील स्वाती म्हैत्रे, अमरावतीच्या माधुरी चव्हाण, धुळे येथील मंगला मोरे तसेच मुंबईच्या प्रज्ञा पितळे यांचा समावेश होता.

सेवा गौरव पुरस्काराने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
बालक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देणारे पत्रकार अक्षय शिंदे आणि डॉ. सचिदानंद तौर यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

लोककलेच्या सादरीकरणाने रंगला महोत्सव
हिरकणी महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले, शाहीर आप्पासाहेब उगले आणि त्यांच्या संचाच्या वतीने मोफत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोककला, पोवाडे आणि प्रबोधनपर सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमादरम्यान समाजप्रबोधनासह मनोरंजनाचीही मेजवानी लाभली.

भाग्यवान महिलांना पैठणी साड्यांचे वितरण
महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या महिलांमधून सोडत पद्धतीने विमल गाडेकर,सितल खरात, प्रिती खरात या तीन भाग्यवान महिलांची निवड करून त्यांना पैठणी साड्या भेट देण्यात आल्या. या उपक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता कोल्हे यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या वतीने शाहीर आप्पासाहेब उगले यांनी मानले. महिला सक्षमीकरण, आरोग्य, कायदेविषयक जनजागृती, रोजगार, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक जतन या सर्व घटकांचा संगम घडवून आणणारा हिरकणी महोत्सव जालना शहरात यशस्वीपणे संपन्न झाला.

प्रतिनिधी