मुंबईची लाईफलाईनच बनली ‘डेथलाईन’, गेल्या 8 वर्षातील मृतांचा आकडा पाहून थरकाप उडेल

या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.

Published By Shubh Prabhat
On

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल आता मृत्यूचा सापळा बनली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे म्हणजे दररोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे, हेच मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. या घटनेत, दोन लोकल ट्रेनमधून एकाच वेळी ८ प्रवासी खाली पडले, ज्यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, बॉम्बे उच्च न्यायालयाने तात्काळ या अपघाताची दखल घेत मध्य रेल्वेकडून गेल्या काही वर्षांतील अशा अपघातांचा सविस्तर अहवाल मागवला होता. न्यायालयाच्या याच आदेशाचे पालन करत मध्य रेल्वेने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

Indian_Fast

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अधिवक्ता अनामिका मल्होत्रा यांच्यामार्फत मध्य रेल्वेने न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात रेल्वे अपघातांची आकडेवारी आणि विविध मुख्य कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. रेल्वे ट्रॅकवर होणारे सर्रास अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनखाली येणे, धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जाणे, तोल जाऊन खाली पडणे यामुळे या मृत्यूंचा आकडा मात्र दरवर्षी वाढत जात आहे. मध्य रेल्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील रेल्वे अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही आकडेवारी मुंबईतील रेल्वे प्रवासातील धोक्याचे गंभीर चित्र दर्शवते.


प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज