मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडा; संधींच्या अवकाशात भरारी घ्या : राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर

परतूरला ३२ वर्षांनंतर युवक महोत्सवाचे यजमानपद

Published By Dainik Shubh Prabhat
On

परतूर, दि. ७ : आजच्या तरुणाईसमोर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र, मोबाईलच्या स्क्रिनवरील आभासी जगात अडकून न राहता प्रत्यक्ष जगातील संधी ओळखून युवकांनी आपल्या भविष्याला आकार द्यावा. संधींचे प्रचंड अवकाश तरुणांना खुणावत असून त्यात भरारी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन यंदा परतूर येथे करण्यात आले आहे. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी हा महोत्सव होत आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर परतूरला युवक महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी महोत्सवाचे उद्घाटन मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते.

Indian_Fast

यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी अधिसभा सदस्य कपिल आकात, उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात, माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. भागवत कटारे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, संस्थेचे संचालक गोविंदराव थिटे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, अधिसभा सदस्य डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. हरिदास सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, संयोजन समितीचे सदस्य डॉ. दिलीप महालिंगे, डॉ. किशोर शिरसाठ, डॉ. समाधान इंगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

युवा शक्ती देशाची खरी ताकद

मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या, युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. युवक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. विशेष म्हणजे यंदा महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ही समाधानाची बाब आहे. या महोत्सवातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिनिधी

संबंधित समाचार